श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज, असे वाचून आपल्या मनात निश्चितच जिज्ञासा निर्माण झालेली असणार की, परमानंदाचा स्त्रोत हा एक अज्ञात चंद्रकांतमणी स्वामी परमानंदगिरीजी महाराज म्हणजे नेमके काय? अशी जिज्ञासा केवळ आपल्याच मनात हे वाचून निर्माण झाली असे नव्हे तर हे वाचण्यापूर्वीदेखील अनेकांच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झालेली आहे त्या जिज्ञेसेची पूर्तता करावी, असा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. चंद्रकांत मण्याबाबत यापूर्वी मी एका पुस्तकात वाचले होते. चंद्रकांतमणी म्हणजे असा मणी की जो स्वयंप्रकाशित असतो व त्या मण्याच्या सान्निध्यात जे दुसरे मणी येतात त्या मण्यांनादेखील हा चंद्रकांत मणी आपल्यासमान बनवितो. असा जो चंद्रकांत मणी असतो तो मात्र अत्यंत दुर्मिळ असतो. काही भाग्यवंतांनाच त्याचा लाभ होतो. भाग्याशिवाय किंवा भगवंताच्या कृपेशिवाय तो मिळणे अशक्य असते, त्याचप्रमाणे संत जन या जगात अत्यंत दुर्मिळ असतात. जसे...
बहु अवघड आहे संत भेटी । परि जगजेठी कृपा केली ।।
या वचनाप्रमाणे खरे संत मिळणे व त्यांची ओळख होणे अतिशय दुर्लभ आहे, मिळाले असेल तर ते भगवंताच्या कृपेशिवाय शक्य नाही. जसे भगवान शिवदेखील माता पार्वतीला म्हणतात...
गिरीजा संत समागम सम लाभ न कछू आन । बिनु हरिकृपा न होइ सो गावही वेद पुराण ।।
भगवंताच्या कृपेशिवाय खऱ्या संतांची प्राप्ती होणे अशक्य आहे. याचे एक कारण हे ही आहे की, खरे संत जगापासून स्वत:ला अदृश्य, अलिप्त ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. जसे श्री स्वामी परमानंदगिरीजी महाराज.
या जगात अनेक संत,महात्मे,योगी होऊन गेले. जोपर्यंत ते स्थूल शरीराने कार्य करत होते तोपर्यंत त्यांना सर्वसामान्य जग ओळखू शकले नाही, त्यांना जाणू शकले नाही, त्यांच्या दिव्य अध्यात्म शक्तीचा लाभ घेऊ शकले नाही. ते गेल्यानंतर आज मात्र त्यांच्या समाधीस्थानावर हजारो लोकांच्या रांगा लागतात. त्यांच्या समाधीच्या दर्शनाने स्वत:ला कृतार्थ माणतात. आज जेवढे लोक त्यांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतात, त्यांना माणतात त्यापेक्षा ते असतांना त्यांना माणणारे, जाणणारे लोक अगदी अल्प होते. असाच अनेक महापुरुषांचा इतिहास आहे. याचे निश्चित कारण काय? याचे निश्चित कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यास हेच आढळून आलेले आहे की ते महापुरुष स्थूल शरीराने कार्य करीत असताना जगापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते. जगत् प्रसिद्धीपासून ते स्वत:ला वाचवित होते. ज्यांना त्यांच्या दिव्य शक्तीचा अनुभव आला अशा भक्तांनी त्यांच्या दिव्य शक्तीचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून त्यांची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तितकासा यशस्वी झालेला नाही. कारण ते महापुरुष स्वत:ला जगापासून अलिप्त ठेवत आलेले आहेत. स्वत:ला झोकून घेत आलेले आहेत. म्हणून त्यांच्या हयातीत जे खरे जिज्ञासू वृत्तीचे होते, त्यांच्या कठोर परीक्षेत जे पास झाले तेच त्यांना जाणू शकले, असा आजपर्यंतचा इतिहास आहे.
स्वत:ला अज्ञात ठेवण्याचे अनेक प्रकार आजपर्यंत संतांनी अवलंबिलेले आहे. जसे एखाद्या दरी कपारीत, गुहेत, अरण्यात, एकांतात निवास करणे. ज्या वेळेस लोकांतात आले तेव्हा साधारण वेशात निवास करुन जगाच्या प्रसिद्धीपासून शक्य तितके स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करुन भगवद् भजनात, आत्मानंदात निमग्न राहुन परमानंदाचा आस्वाद घेत राहिले. असेच एक परमानंदाचा आस्वाद घेणारे, परमानंदात सदैव निमग्न राहणारे एकांतप्रिय परंतु भक्तांनी जगत् उद्धारासाठी त्यांना लोकांतात आणून थोडी फार प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला तरी त्यापासून अलिप्त राहून स्वत:ला शक्य तितके अदृश्य अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करुन परमानंदात लीन राहणारे श्री स्वामी परमानंदगिरीजी महाराज.